तांदुळवाडी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील सर्व शालेय वाहनांची तातडीने तपासणी; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांचे आदेश
तांदुळवाडी येथे ३ जुलै रोजी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचा स्टिअरिंग रॉड तुटून झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील सर्व शालेय वाहनांची आणि वाहन चालकांची विशेष तपासणी करण्याचे आदेश तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी डॉ. अमित पवार यांनी दिले आहेत. या मोहिमेअंतर्गत सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांमधील विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बस, व्हॅन, ऑटो रिक्षा आदी वाहनांची तसेच चालकांची संयुक्त तपासणी करून सात दिवसांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.तहसीलदार कार्यालयाकडून शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद अहिल्यानगर यांना पाठविण्यात आलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसली, तरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा अत्यंत गंभीर प्रश्न पुढे आला आहे. शालेय वाहनांच्या तांत्रिक दोषांमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तालुक्यातील सर्व शालेय वाहन व्यवस्थेची काटेकोर तपासणी करणे आवश्यक आहे.या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत प्रत्येक वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग, ब्रेक यंत्रणा, स्टिअरिंग रॉड, टायरची स्थिती, विमा तसेच इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल तपासणी केली जाणार आहे.याशिवाय वाहन चालकांचीही स्वतंत्र पडताळणी करण्यात येणार असून त्यांच्याकडे वैध वाहन परवाना आहे का, व्यावसायिक पात्रता, निष्कलंक सेवा अनुभव, चारित्र्य पडताळणी, अपघात अथवा इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तसेच मद्य किंवा मादक पदार्थांच्या सेवनासंदर्भातील माहितीची तपासणी केली जाणार आहे. चालकांची दृष्टी, शारीरिक क्षमता, सार्वजनिक आरोग्य आणि व्यसनमुक्ती यासंदर्भातील वैद्यकीय तपासणीही केली जाणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
तपासणीदरम्यान तांत्रिकदृष्ट्या अयोग्य अथवा सुरक्षा निकष पूर्ण न करणारी वाहने आढळल्यास त्यांना तात्काळ विद्यार्थी वाहतुकीसाठी बंदी घालण्यात येणार आहे. तसेच संबंधित शाळा प्रशासन आणि वाहन चालकांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.सर्व शाळांना तातडीने सूचना देऊन वाहन व वाहन चालक तपासणीची मोहीम पूर्ण करावी आणि वाहनांची संख्या, तपासणी झालेली वाहने, सुस्थितीत व दोषयुक्त वाहने, त्यांच्यावर करण्यात आलेली कारवाई तसेच चालकांची पात्रता तपासणी व अपात्र चालकांवरील कारवाई यांचा सविस्तर अहवाल विहित नमुन्यात पुढील सात दिवसांत तहसीलदार कार्यालयाकडे सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, या आदेशाची प्रत पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी, श्रीरामपूर, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती राहुरी, पोलीस निरीक्षक राहुरी यांना पाठविण्यात आली असून माहितीस्तव जिल्हाधिकारी अहिल्यानगर तसेच उपविभागीय अधिकारी, राहुरी यांनाही सादर करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत राहुरी तालुक्यात शालेय वाहनांच्या सुरक्षिततेबाबत व्यापक तपासणी मोहीम राबविण्याचा प्रशासनाचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
दिपक साळवे सह योगेश पवार. NEWS 14 राहुरी

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार





















