बदलत्या परिस्थितीत पौष्टिक तृणधान्यांना अनन्यसाधारण महत्त्व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांचे वक्तव्य
बदलत्या परिस्थितीत पौष्टिक तृणधान्ये हे रोग कीड प्रतिकारक तसेच कमी पाण्यात येणारे आहे. पौस्टिक तृणधान्य आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असल्याकारणाने या पिकांच्या लागवडीस भरपूर वाव असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि विद्यापीठ आणि कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या पौष्टिक तृणधान्य प्रकल्पांतर्गत शिवार फेरी व नाचणी पीक प्रात्यक्षिके या कार्यक्रमाचे आयोजन श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील प्रगतीशील शेतकरी श्री. सलीम आत्तार यांच्या विद्यापीठनिर्मित फुले कासारी वाणाच्या नाचणी पिकाच्या प्रात्यक्षिक प्लॉटवर करण्यात आले होते. यावेळी डॉ. प्रशांत बोडके मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक आणि कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. पंडित खर्डे, प्रभारी तालुका कृषि अधिकारी सौ. प्रमीला जंजिरे, जिल्ह्याचे महाबीजचे व्यवस्थापक श्री. सुनील दौंड, शेतकरी संघटक श्री. राहुल पोळ, कोल्हापूर येथील अखिल भारतीय समन्वयित नाचणी व पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. योगेश बन, डॉ. सुनील अडांगळे, प्रा. अन्सार आत्तार उपस्थित होते. यावेळी डॉ. प्रशांत बोडके मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की नागलीसारख्या पौष्टिक तृणधान्यामध्ये प्रक्रिया करण्यास भरपूर वाव असून यामुळे शेतकर्यांना प्रक्रियाद्वारे अधिक अर्थाजन मिळू शकते. संतुलित खत वापर या अभियानांतर्गत त्यांनी जैविक खते तसेच हिरवळीच्या खतांचे महत्त्व विशद केले. येत्या खरीप हंगामात पिकांचे योग्य नियोजन करून हा हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ.पंडित खर्डे यांनी प्रास्ताविकात प्रकल्पाची माहिती देऊन त्याची उद्दिष्टे सांगितली. ते म्हणाले की या प्रकल्पांतर्गत कोल्हापूर, अहिल्यानगर, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात पाचशेपेक्षा जास्त पौष्टिक तृणधान्यांची पीक प्रात्यक्षिके या खरीप हंगामात घेण्यात येतील आणि या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल. या कार्यक्रमादरम्यान सौ. जंजिरे, श्री.दौंड तसेच शेतकरी संघटक श्री. राहुल पोळ आणि शेतकरी श्री. सलीम आत्तार, श्री. भाऊसाहेब घाटे, श्री. राजेंद्र बिबवे, मेजर परमेश्वर गिलके यांनी नाचणी पीक लागवडीबद्दल आपले अनुभव सांगितले. यावेळी डॉ. योगेश बन यांनी नाचणी व पौष्टिक तृणधान्य पिकांचे महत्त्व व लागवड तंत्रज्ञान याबद्दल शेतकर्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते संतुलित खत वापर व्यवस्थापन अभियान २०२६ चे भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. सुनील अडांगळे यांनी केले तर डॉ. योगेश बन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी आणि शेतकर्यांनी फुले कासारी नाचणी वाणाच्या पीक प्रात्यक्षिकांना भेटी देऊन पिकाची पाहणी केली. याप्रसंगी श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण, बनपिंपरी, नवनाथनगर येथील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषि विद्यापीठ,कृषि विभाग तसेच आयोजक शेतकर्यांनी प्रयत्न केले.
दिपक साळवे सह योगेश पवार

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




