समाजसेवक अशोक श्रावण जाधव यांचे आकस्मिक निधन; राहुरी शहरासह लाख जातप गावावर शोककळा
राहुरी तालुक्यातील राहुरी शहराच्या राजवाडा परिसरामध्ये दलित पँथरच्या माध्यमातून तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून दीर्घकाळ समाजसेवेत कार्यरत असलेले अशोक श्रावण जाधव यांचे गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांच्या जन्मगावी लाख जातप येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच लाख जातप गावासह राहुरी शहरातील राजवाडा परिसरावर शोककळा पसरली.
अशोक जाधव हे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले आणि आंबेडकरी विचारांशी निष्ठेने जोडलेले कार्यकर्ते म्हणून परिचित होते. दलित पँथरपासून त्यांनी समाजसेवेचा प्रवास सुरू केला होता. सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने काम केले.
राहुरी शहरातील राजवाडा परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याची स्थापना करण्याच्या कार्यात अशोक जाधव यांचा मोलाचा वाटा होता. या कार्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न आणि दिलेले योगदान आजही परिसरातील नागरिकांच्या स्मरणात आहे.
आंबेडकरी चळवळीचा विचार आणि वारसा त्यांच्या जीवनकार्याचा अविभाज्य भाग होता. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक वर्षे विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये तसेच राजवाडा परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
अशोक जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
आंबेडकर चळवळीशी आणि सामाजिक कार्याशी आयुष्यभर जोडले गेलेले अशोक श्रावण जाधव यांचे आकस्मिक निधन ही सामाजिक क्षेत्रासाठी मोठी हानी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.त्यांच्या सामाजिक कार्याच्या आठवणी कायम स्मरणात राहतील.
News 14.दिपक साळवे सह योगेश पवार

✍🏻मुख्य संपादक – संजय जाधव
✍️उप संपादक – ऋषी पोळ
✍️कार्यकारी संपादक – दिपक साळवे
✍️तालुका प्रतिनिधी – योगेश पवार




